Police Constable Sheikh Anwar Sheikh Abdul Rauf passed away | राज्य पोलीस दलाने गमावला कर्तव्यदक्ष सहकारी
Police Constable Sheikh Anwar Sheikh Abdul Rauf passed away

बीड : सध्या राज्यात सणासुधीचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे विविध धर्मियांचा सण-उत्सव शांततेत पार पडण्यासाठी सर्व जिल्हा पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सतर्क आहेत. अशाच प्रकारे बीड शहरातील प्रसिद्ध शहेंशाहवली दर्गा उरूसनिमित्त निघालेल्या संदल मिरवणुकीसाठी बंदोबस्तावर तैनात असलेल्या अंमलदार शेख अन्वर शेख अब्दुल रौफ यांचे (Police Constable Sheikh Anwar Sheikh Abdul Rauf passed away ) हार्टफेल झाले. अवघ्या वयाच्या ३५ वर्षी आॅनड्युटी निधन झाल्याने राज्य पोलीस दलातील अनेकांनी शोक व्यक्त केला. ही धक्कादायक घटना २९ सप्टेंबर रोजी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास घडली. त्यांच्या पश्चात आई,पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.
२०१२ साली बीड पोलीस दलात अंमलदारपदी भरती झालेले शेख अन्वर भरती झाले. त्यांनी वाहतूक शाखा, स्थानिक गुन्हे शाखेत कर्तव्य बजावले. सध्या ते दंगल नियंत्रण पथकात कर्तव्याला होते. पेठ बीड हद्दीत २९ सप्टेंबर रोजी पारंपरिक पद्धतीने शहेंशाहवली दर्गा उरूसनिमित्त संदल मिरवणूक निघाली होती. ही मिरवणूक शांततेत व आनंदी वातावरणात पार पडण्यासाठी बीड जिल्हा पोलीस दलातील पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यात पोलीस अंमलदार अन्वर शेख यांचाही समावेश होता.
दरम्यान, डीजेच्या आवाजात निघालेली मिरवणूक शहेंशाहवली दर्गा परिसरात रात्री ८ वाजता आली. त्यावेळी अचानक शेख अन्वर यांना अस्वस्थ वाटू लागले. सहकारी पोलिसांनी त्यांना तात्काळ जालना मार्गावरील एका खासगी दवाखान्यात नेले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शेख यांच्या निधनाचे वृत्त समजताच पोलीस उप अधीक्षक संतोष वाळके, पेठ बीडचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. ३० सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजता शहेंशाहवली दर्गा परिसरातील कब्रस्थानमध्ये पोलीस अंमलदार अन्वर शेख यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अनेकांना अश्रू झाले अनावर
शेख अन्वर यांचा मृत्यू झाल्याची बातमी काही वेळातच सोशल मीडियाद्वारे राज्यभर पसरली. बीड जिल्हा पोलीस दलातील सहाकरी, बॅचमेट तसेच राज्य पोलीस दलातील अनेक अधिकारी, अंमलदारांनी शोक व्यक्त केला, तर शेख यांच्या रूपात चांगला सहकारी, मित्र, राज्य पोलीस दल परिवारातील सदस्य गमावल्याने अनेकांना अश्रू अनावर झाले.